अहिल्यानगर (प्रतिनिधी) - शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्व सामान्य शिवसैनिकांना न्याय देण्याचे काम करत आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे करत सल्याचे गौरवोद्गार आमदार अमोल खताळ पाटील यांनी काढले.
संगमनेर येथील बसस्थानक येथे शिवसेना स्थापनादिनाच्या निमित्त संगमनेर शिवसेना महायुतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात बोलताना आ. खताळ म्हणाले की, लोकशाही व्यवस्थेत जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर मतदारसंघाचा विकास कामे करण्याची मोठी जबाबदारी असते. विकासकामांना गती देण्यासाठी अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. जनतेच्या हितासाठी आणि मतदारसंघाच्या प्रगतीसाठी सत्तेसोबत राहून विकासाची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक असल्याचे आमदार खताळे यांनी सांगितले.
तुमच्यासोबत असलेले तुमचे सहा खासदार जर तुम्हाला सोडून गेले असतील, तर त्यामागे काही ना काही कारण असणारच. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी आपले खासदार आपल्याला का सोडून गेले याचे आत्मपरीक्षण करावे असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला. शिवसेना स्थापना दिनानिमित्त झालेल्या या कार्यक्रमा तून संगमनेर तालुक्यात शिवसेना संघटना अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच आगामी काळात पक्षवाढीसह जनतेच्या विकासासाठी एकजुटीने काम करण्याचे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या राजकीय वाटचालीला पाठिंबा देताना आमदार खताळ यांनी ठाम भूमिका मांडली.
शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत सहभागी झाले या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी त्यांचा निषेध केला त्याच ठिकाणी आपण शिवसेना स्थापना दिवस साजरा करू अशी मागणी शिवसैनिकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली त्यांच्या मागणीचा विचार करून त्याच बस स्थानकावर आमदार अमोल खताळ पाटील यांच्या नेतृत्वाखाली त्याच ठिकाणी शिवसेना स्थापना दिवस साजरा करून जल्लोष साजरा केला.
"शिवसेनेचा एक जबाबदार कार्यकर्ता म्हणून ज्या ठिकाणी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना विरोध होईल, त्या ठिकाणी मी त्यांची ढाल बनून उभा राहीन,"
- अमोल खताळ पाटील
आमदार संगमनेर विधानसभा


टिप्पणी पोस्ट करा